महाराष्ट्राचा "दादा" हरपला!
अजितदादा पवार यांच्या शिवाय महाराष्ट्राचं राजकारण कल्पनाच करता येत नाही. त्यांच्या नावासोबत केवळ पद नव्हे, तर निर्णयक्षमता, धाडस आणि ठाम नेतृत्व यांची ओळख जोडलेली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात त्यांनी निर्माण केलेली जागा ही सहज भरून न निघणारी आहे.
वक्तशीरपणा आणि कामाची धडाडी हे अजितदादांचे मोठे गुण होते. वेळेचं भान, कामातली शिस्त आणि निर्णयातील स्पष्टता त्यांच्या रोजच्या कामकाजातून कायम दिसून आली. कामाची आवड हीच त्यांची खरी ओळख होती आणि त्यामुळेच प्रशासन त्यांना गांभीर्याने घेत असे.
राज्याच्या विकासात त्यांनी घेतलेली भूमिका ठळक आहे. अर्थसंकल्प सादर करताना वित्तीय शिस्त, निधीचं योग्य नियोजन आणि विकासकामांना प्राधान्य देण्याची त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली. पुणे–पिंपरी-चिंचवड परिसरातील रस्ते, पायाभूत सुविधा, नागरी प्रकल्प, तसेच पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना त्यांनी दिलेला पाठिंबा हे त्यांच्या विकासदृष्टीचं उदाहरण आहे.
ग्रामीण महाराष्ट्रासाठी सहकारी चळवळ, साखर उद्योग, दुग्ध व्यवसाय आणि शेतकरी अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी त्यांनी सातत्याने काम केलं. कोरोना काळात प्रशासनावर पकड ठेवत परिस्थिती हाताळणं, निर्णय वेळेत घेणं आणि जबाबदारीने नेतृत्व करणं—यामुळे त्यांची कार्यक्षमता अधिक ठळकपणे समोर आली.
सचोटी आणि स्पष्टवक्तेपणा हे अजितदादांचे वैशिष्ट्य. चूक दिसली तर ती दुर्लक्षित न करणं, गरज पडल्यास भरसभेत पदाधिकाऱ्यांना झापणं , पण त्यामागे व्यवस्था सुधारण्याची तळमळ असणं हे त्यांच्या नेतृत्वाचं खरे स्वरूप होतं. त्यांचा मिश्किल स्वभाव आणि माणुसकीचा ओलावा मात्र अनेकांना आपलंसं करून जायचा.
तळागाळातल्या कार्यकर्त्याची दखल घेणारा, सामान्य माणसाचं म्हणणं ऐकणारा आणि प्रशासनाकडून काम करून घेणारा असा हा नेता. म्हणूनच ते महाराष्ट्राचे सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री म्हणून निवडले गेले. पदापेक्षा काम मोठं असतं, हे त्यांनी वारंवार सिद्ध केलं.
असा हा महाराष्ट्राचा लाडका दादा कठोर पण न्याय्य, थेट पण मनाचा चांगला, शिस्तप्रिय पण माणुसकी जपणारा. त्यांच्या नेतृत्वाचा ठसा, त्यांनी केलेली कामं आणि त्यांनी निर्माण केलेला विश्वास हे कायम स्मरणात राहील. या नेतृत्वाला मनापासून भावपूर्ण आदरांजली.
© महेश मधुकर चव्हाण – सर्वाधिकार राखीव.
Comments
Post a Comment