महाराष्ट्राचा "दादा" हरपला!
अजितदादा पवार यांच्या शिवाय महाराष्ट्राचं राजकारण कल्पनाच करता येत नाही. त्यांच्या नावासोबत केवळ पद नव्हे, तर निर्णयक्षमता, धाडस आणि ठाम नेतृत्व यांची ओळख जोडलेली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात त्यांनी निर्माण केलेली जागा ही सहज भरून न निघणारी आहे. वक्तशीरपणा आणि कामाची धडाडी हे अजितदादांचे मोठे गुण होते. वेळेचं भान, कामातली शिस्त आणि निर्णयातील स्पष्टता त्यांच्या रोजच्या कामकाजातून कायम दिसून आली. कामाची आवड हीच त्यांची खरी ओळख होती आणि त्यामुळेच प्रशासन त्यांना गांभीर्याने घेत असे. राज्याच्या विकासात त्यांनी घेतलेली भूमिका ठळक आहे. अर्थसंकल्प सादर करताना वित्तीय शिस्त, निधीचं योग्य नियोजन आणि विकासकामांना प्राधान्य देण्याची त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली. पुणे–पिंपरी-चिंचवड परिसरातील रस्ते, पायाभूत सुविधा, नागरी प्रकल्प, तसेच पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना त्यांनी दिलेला पाठिंबा हे त्यांच्या विकासदृष्टीचं उदाहरण आहे. ग्रामीण महाराष्ट्रासाठी सहकारी चळवळ, साखर उद्योग, दुग्ध व्यवसाय आणि शेतकरी अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी त्यांनी सातत्...