"शिक्षणव्यवस्था की स्वप्नांचा कत्तलखाना?"
देशात लाखो विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करून NEET सारख्या परीक्षेची तयारी करतात. पालक स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून मुलांच्या स्वप्नांसाठी पैसा, वेळ आणि आयुष्य खर्च करतात. पण परीक्षा केंद्रावर फक्त दोन मिनिटे उशीर झाला म्हणून विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला जातो आणि त्यांच्या वर्षभराच्या नव्हे तर अनेकदा दोन-दोन वर्षांच्या मेहनतीवर पाणी फिरते.
प्रश्न असा आहे की, शिक्षण व्यवस्था विद्यार्थ्यांसाठी आहे की विद्यार्थी शिक्षण व्यवस्थेच्या दयेवर जगण्यासाठी?
जे विद्यार्थी डॉक्टर होण्याचे स्वप्न घेऊन आले होते, त्यांना दोन मिनिटांच्या कारणावरून गेटबाहेर उभे केले जाते. त्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यातील अश्रू, पालकांचा आक्रोश आणि तुटलेली स्वप्ने कोण मोजणार? नियम महत्त्वाचे आहेत, पण नियमांमध्ये माणुसकी नसली तर ते न्याय नसून केवळ यंत्रवत प्रशासन ठरते.
आपल्या देशात अनेक ठिकाणी सरकारी कामांमध्ये तासन्तास विलंब चालतो. प्रकल्प वर्षानुवर्षे रखडतात. कार्यालयांमध्ये नागरिकांची वेळ वाया घालवली जाते. तेव्हा कुणालाही शिक्षा होत नाही. पण विद्यार्थ्यांच्या बाबतीत मात्र सेकंदाचा हिशोब केला जातो. ही विसंगती का?
शिक्षण व्यवस्थेचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणे असायला हवे, भविष्य उद्ध्वस्त करणे नव्हे. शिस्त आवश्यक आहे, पण शिस्त आणि संवेदनशीलता यांचा समतोलही तितकाच आवश्यक आहे. दोन मिनिटांच्या उशिरामुळे एखादा विद्यार्थी अचानक कमी पात्र होत नाही.
आज गरज आहे अशा व्यवस्थेची जी नियमांचे पालन करेल, पण मानवी परिस्थितीही समजून घेईल. विद्यार्थ्यांना गुन्हेगारांसारखी वागणूक देणारी नव्हे, तर त्यांची स्वप्ने जपणारी शिक्षण व्यवस्था उभी राहिली पाहिजे.
कारण परीक्षा फक्त प्रश्नपत्रिकेची नसते, ती एका कुटुंबाच्या आशा-आकांक्षांचीही असते.
दोन मिनिटांचा उशीर ही चूक असू शकते; पण त्या बदल्यात एखाद्या विद्यार्थ्यांचे 2 वर्ष वाया जाऊ देन्याची शिक्षा देणे हा योग्य न्याय नाही.
© महेश मधुकर चव्हाण – सर्वाधिकार राखीव.
Comments
Post a Comment